नवी दिल्ली : भारताने पाकव्याप्त जम्मू काश्मीरसह पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर मध्यरात्री हल्ला करून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर आली आहे.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने हल्ला करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले. यातील एका तळावर वास्तव्यास असलेल्या मसूद अझहरच्या कुटुंबातील १० तर निकटवर्तीय असलेल्या ४ सदस्यांचा मृत्यू झाला. या हल्यात मसूद अझहरचा भाऊ रौफ असगर हा गंभीर जखमी झाला आहे. तर ठार झालेल्यांमध्ये मसूद अझहरचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रौफ असगरचा मुलगा हुजैफा यांचा देखील समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.
मसूद अझहरने आजवर भारताविरुद्ध अनेक वेळा मोठे कट रचले आहेत. मौलाना मसूद अझहर हा पाकिस्तानमध्ये वाढलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. २००१ मध्ये संसदेवरील हल्ल्याचा कट त्यानेच रचला होता. यासह उरी हल्ल्यातही मसूद अझहर हाच सूत्रधार होता. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पठाणकोट येथील लष्कराच्या तळावरील हल्ल्यातही त्यांनी भूमिका बजावली होती.