बेळगाव / प्रतिनिधी
पहलगाममध्ये फिरायला गेलेल्या २६ पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारतीय लष्कराने योग्य धडा शिकवला. या पार्श्वभूमीवर बेळगावात भाजपतर्फे गुरुवारी शहरातील राणी चन्नम्मा सर्कल येथील श्री गणेश मंदिरात विशेष पूजा करण्यात आली.
त्यानंतर शहरातील राणी चन्नम्मा सर्कल येथे भाजप कार्यकर्त्यांनी जनतेला मिठाईचे वाटप करून बोलो भारत माता की जयचा जयघोष करत आनंद साजरा केला. यावेळी भाजप महानगर अध्यक्षा गीता सुतार म्हणाल्या की, ऑपरेशन सिंधुरच्या माध्यमातून दहशतवाद्यांचे ९ तळ उधवस्त करून पंतप्रधान मोदींना योग्य धडा शिकवला असून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या आत्म्याला आज शांती मिळाली आहे.

ऑपरेशन सिंधुरच्या माध्यमातून पहलगाम येथे झालेल्या दहशतवाद्यांना भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. बेळगावची सून कर्नल सोफिया कुरेशी आणि कर्नल रोमिका सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारताने अतिरेक्यांच्या लपलेल्या ठिकाणांवर हल्ला केला. भाजप महिला नेत्या शिल्पा केकरे म्हणाल्या की, भारतीय महिलांचे सिंदूर पुसून टाकण्याचे काम करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय महिला सेनेच्या अधिकाऱ्यांनी सिंदूरची ताकद दाखवून दिली आहे.

याप्रसंगी माजी खासदार मंगला अंगडी यांनीही भारतीय लष्कराच्या कार्याचे कौतुक केले आणि पंतप्रधान मोदी आणि भारतीय लष्कराचे अभिनंदन केले. यावेळी उपमहापौर वाणी जोशी, भाजप शहर कार्यकर्ते हणमंत कोंगाळी, राजशेखर डोणी, जयतीर्थ सौंदत्ती, पदाधिकारी उज्ज्वला बडवाण्णाचे, विजया कोडगनूर, रविकुमार पावले, लीना टोपण्णावर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.