- नागरिक आणि व्यापाऱ्यांना दिलासा
बेळगाव / प्रतिनिधी
गणपत गल्लीसह शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये फेरीवाले आणि बैठे विक्रेते रस्त्यावरच ठाण मांडून व्यवसाय करत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. विशेषतः गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, रविवार पेठ, रामदेव गल्ली आणि समादेवी गल्ली याठिकाणी सतत कोंडी निर्माण होत होती.
एकेरी वाहतूक असलेल्या रस्त्यावरही वाहनांची दोन्ही बाजूंनी ये – जा सुरू होती. पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्यामुळे वाहनचालक कुठेही गाड्या पार्क करत होते. यामुळे वाहतूक पोलिसांवर नाराजी व्यक्त केली जात होती. अखेर महापालिका आणि वाहतूक पोलीस विभागाने संयुक्तरित्या मोहीम राबवून व्यापाऱ्यांनी दुकानाच्या हद्दीबाहेर ठेवलेले साहित्य जप्त केले. तसेच भाजीपाला, फळे, फुले विकणाऱ्या फेरीवाल्यांना हटविण्यात आले.
एकंदरीत शहरातील वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत अतिक्रमण व फेरीवाल्यांना हटविल्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.