बेळगाव / प्रतिनिधी

महेश फौंडेशनच्या नवीन शाळा आणि कौशल्य केंद्राचे उदघाटन काँग्रेस युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले. या नवी शाळा आणि केंद्राचा अकराशे मुलांना लाभ होणार आहे. केवळ पायाभूत सुविधांमुळे मुलांचा विकास होत नाही तर यासाठी गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर त्यांच्यात कौशल्याचा विकास करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भविष्यात मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांच्यात व्यावहारिक क्षमता वाढवली पाहिजेत, असेही, काँग्रेस युवा नेते राहुल जारकीहोळी उद्घाटनपर भाषणात म्हणाले.

बेळगावातील कणबर्गी येथे महेश फौंडेशनच्या नवीन शाळा आणि कौशल्य केंद्राचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. नवीन शाळा आणि कौशल्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना ते म्हणाले, “महेश फाउंडेशन गेल्या १७ वर्षांपासून निःस्वार्थपणे समाजाची सेवा करत आहे. गेल्या चार वर्षांपासून त्यांचे उदात्त कार्य मी स्वतः पाहत आलो आहे. ते मुलांना घेत असलेली काळजी आणि प्रेम खरोखरच प्रशंसनीय आहे. सततच्या प्रयत्नांमुळे, महेश फाउंडेशनने अनेक गरीब मुले आणि गरजू महिलांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. फौंडेशनच्या नवीन शाळा आणि कौशल्य केंद्राचे उद्घाटन करताना मला आनंद होत आहे.

“जेव्हा आपण एका मुलाला शिक्षित करतो तेव्हा आपण एका कुटुंबाची, एका समुदायाची, एका समाजाची आणि त्या अनुषंगाने एका राष्ट्राचा उन्नती करतो. शिक्षणाची हीच ताकद आहे. हजारो मुलांना शिक्षित करण्याच्या उल्लेखनीय उपक्रमाबद्दल मी महेश फाउंडेशनचे आभार मानू इच्छितो. मंत्री श्री. सतीश जारकीहोळी यांनी समाजात विविध प्रकारे योगदान दिले आहे आणि महेश फाउंडेशनच्या उपक्रमांनाही पाठिंबा दिला आहे. समाजसेवेसाठी त्यांच्या समर्पणाबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. बेळगाव जिल्हा १०० टक्के साक्षर जिल्हा बनवण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम घेत आहोत. येणाऱ्या काळात महेश फाउंडेशनला आमचा पूर्ण पाठिंबा राहील अशी ग्वाही देत प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण आणि उज्ज्वल भविष्य मिळेल अशी अपेक्षा,” असे बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी महेश फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले.

काम ही पूजा आहे आणि मुलांची सेवा करणे हे एक पवित्र कर्तव्य आहे. असा “महेश फाउंडेशनचा विश्वास आहे. शिक्षण एखाद्या व्यक्तीकडे असलेली सर्वात मौल्यवान संपत्ती आहे आणि मला विश्वास आहे की ही मुले भविष्यात खूप उंची गाठतील. या विशेष मुलांसाठी एक विशेष शाळा सुरू करण्यात महेश फाउंडेशनला मदत करणाऱ्या सतीश जारकीहोळी यांचे मी मनापासून आभार मानतो. मुलांचे भविष्य घडवण्यात आणि त्यांना योग्य शिक्षण देण्यात त्यांच्या योगदानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे,” असे बेळगाव शहराचे गट शिक्षणाधिकारी रवी भजंत्री म्हणाले.

“मला अजूनही ते दिवस आठवतात जेव्हा या मुलांना विशेष शाळांमध्ये प्रवेश नव्हता आणि त्यांच्या एचआयव्ही स्थितीमुळे त्यांना समाजबाह्य केले जायचे. त्यांच्यासोबत कोणीही राहण्यास तयार नव्हते. तथापि, या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महेश फाउंडेशनने दाखवलेले समर्पण आणि दृढनिश्चय खरोखरच कौतुकास्पद आहे. आज त्यांची प्रगती पाहता महेश फाउंडेशनसाठी स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. भविष्यात त्यांच्या निरंतर यशासाठी मी संस्थेला शुभेच्छा देतो,” असे बेळगाव माळमारुती पोलिस स्टेशनचे सीपीआय झाकीर पाशा कालीमिर्ची म्हणाले.

महेश फाउंडेशनचे संस्थापक. महेश जाधव म्हणाले, “हा प्रवास एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलांसाठी अनाथाश्रमापासून सुरू झाला आणि नंतर आम्ही या विशेष मुलांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु या शाळेची परवानगी मिळविण्यात आम्हाला अनेक अडचणीना सामोरे जावे लागले. सतीश जारकिहोळी, आसिफ सेठ आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आम्हाला परवानगी मिळाली. रक्तपेढीचा परवाना मिळविण्यात आम्हाला सहकार्य करणाऱ्या सतीश जारकिहोळीसह सर्वांचे आम्ही आभारी आहोत.”

याप्रसंगी नगरसेविका अस्मिता भैरगौडा पाटील, महेश फाउंडेशनची मुले, पालक, कर्मचारी आणि स्वयंसेवक उपस्थित होते.