बेंगळूर : कृष्णा जल लवादाच्या अंतिम आदेशाच्या अंमलबजावणीबाबत कोणती पावले उचलावीत या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.

कृष्णा जल लवाद दोनच्या निकालाबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय जलशक्ती खात्याच्या मंत्र्यांनी दि. ७ मे रोजी दिल्लीत कृष्णा खोऱ्यातील राज्यांच्या पाटबंधारे मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांच्या बैठकीत कृष्णा नदीच्या पाणी वाटपाच्या मुद्द्यावर जल लवादाच्या निकालानुसार राजपत्रित अधिसूचना जारी करावी यासाठी दबाव आणला जाईल. यासाठी लवकरच सर्व पक्षीय बैठक बोलावून चर्चा करण्यात येणार आहे.केंद्रीय जलशक्ती खात्याच्या मंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला राज्याची भूमिका मांडण्यापूर्वी शनिवारी प्रास्ताविक बैठक घेण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि राज्याचे पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली.