बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळ गावाजवळील सर्व्हे क्र. १२३ व १२४ मधील जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला जात असून हा प्रकार त्वरित थांबवावा. तसेच या संदर्भात कोरे आणि मुनवळ्ळी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी कल्लेहोळ येथील संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कल्लेहोळ येथील बहुसंख्य अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जमून शेतकरी उत्तम कृष्णा राक्षे यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी कोरे आणि मुनवळ्ळी निषेधाच्या घोषणा देऊन उपस्थित शेतकऱ्यांनी हिरवे शेले फडकावत जोरदार निदर्शने केली. तसेच कोरे व मुनवळ्ळी यांची दादागिरी थांबून शेतकऱ्यांना न्याय द्या अशी जोरदार मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली. या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना एका अन्यायग्रस्त शेतकऱ्याचे वकील अॅड. विठ्ठल उपरी यांनी सांगितले की, बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळ गावामधील सर्व्हे नं. १२३ १२४ व अन्य कांही सर्व्हे नंबर मधील सुमारे ५०-१०० लोकांच्या जमिनी बेकायदेशीररित्या बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझे अशिल हे सेवानिवृत्त जवान आहेत. प्राण पणाला लावून देशसेवा केलेल्या या व्यक्तीची जमीन देखील हडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी तक्रार ग्रामस्थांनी केली.