- यात्रेनिमित्त वाडी रत्नागिरी डोंगरावर जय्यत तयारी
- शासकीय महापूजेला दहा जणांना प्रवेश
कोल्हापूर / प्रतिनिधी
दख्खनचा राजा जोतिबा अर्थात देव केदारनाथाची महत्त्वाची यात्रा म्हणून चैत्र यात्रेकडे पाहिले जाते. या महायात्रेला सुरुवात झाली असून उद्या शनिवार दि. १२ एप्रिल रोजी या यात्रेचा मुख्य दिवस आहे. यंदा देखील हजारो, लाखो भाविक यात्रेमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. या दृष्टीने जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने यात्रेचे योग्य नियोजन करण्यात आले आहे.
यात्रेनिमित्त हजारो भाविक जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी येऊन यात्रेत सहभागी होत असतात. या पार्श्वभूमीवर वाहतूक विभाग, आरोग्य विभाग, व्हाईट आर्मी, वाडी रत्नागिरी ग्रामपंचायत यांच्याकडून योग्य असे नियोजन करण्यात आले आहे.
देवाच्या शासकीय पूजेला सहा पुजारी व चार शासकीय अधिकारी अशा दहा जणांना मुख्य गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार आहे. जोतिबा देवाच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया झाल्याने गाभाऱ्यात आद्रता वाढू देऊ नका, अशी सूचना भारतीय पुरातत्त्व विभागाने केल्यामुळे खबरदारी म्हणून केवळ दहा जणांना पास देऊन गाभाऱ्यात सोडले जाणार आहे.गेल्या दोन वर्षांपासून जोतिबा चैत्र यात्रेत प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यंदाही हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याऐवजी कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
यात्रेच्या निमित्ताने पोलीस प्रशासनाकडून गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. मोफत वैद्यकीय कक्ष, प्रथमोपचार केंद्र देखील याठिकाणी सुरू करण्यात आले आहे. तसेच विविध सेवाभावी संस्थांकडून येथे मोफत अन्यछत्र देखील चालवले जाणार आहे. यात्रेच्या निमित्ताने जोतिबा मंदिर सलग ७९ तास भाविकांसाठी खुले असणार आहे. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी वाहतुकीच्या मार्गांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. भाविकांनी आणलेल्या वाहनांच्या पार्किंगसाठी जोतिबा डोंगरावर चारही बाजूला सोय करण्यात आली.
एकंदरीत प्रशासनाने चैत्र यात्रेनिमित्त सर्व तयारी पूर्ण केली आहे. शासकीय यंत्रणेने डोंगरावर तळ ठोकला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, ग्रुप ग्रामपंचायत, पोलीस दल, पुजारी, ग्रामस्थ, सर्व शासकीय यंत्रणा यात्रा सुरळीतपणे पार पडण्यासाठी परिश्रम घेत आहेत. यंदा चैत्र यात्रेत उच्चांकी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारीच सर्व अधिकाऱ्यांनी जोतिबा डोंगर पिंजून काढून जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे यंदाही येथे कोणत्याही प्रकारे गडबड गर्दी न होता, भाविकांना अगदी सहजपणे जोतिबाचे दर्शन घेता येणार आहे.