विजयपूर / दिपक शिंत्रे

“देश की रक्षा कौन करेगा? हम करेंगे! हम करेंगे!”
“जम्मू आणि काश्मीर – भारत मातेचे सिंदूर!”
“या देशाच्या रक्षणाची जबाबदारी कोणाची? आमचीच!”
“काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो!”
“धर्माधारित क्रूर कृत्यांचा अंत व्हावा!”
“शांती आमचा मंत्र, प्रेम आमचं शस्त्र!”

अशा घोषणांनी आपला रोष व्यक्त करत ५१५ विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आवाज उठवला. शांतिकुटीर, कन्नूरमध्ये चालू असलेल्या एक महिन्याच्या ग्रामीण भागातील शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत उन्हाळी शिबिरामध्ये ५ वी ते १० वी च्या मुलामुलींनी पहलगाव येथे झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्याचा निषेध करत आपली शांततामय निदर्शने करुन व्यक्त केली.

“भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत” हे विधान फक्त पाठ्यपुस्तकांपुरते न ठेवता जीवनात आत्मसात करण्याचा प्रयत्न या मुलांनी केला. काश्मीरमधील ह्या क्रूर आणि हीन कृत्याचा निषेध करण्यासाठी त्यांनी हातात मेणबत्त्या प्रज्वलित करून आपल्या मनातील संताप व्यक्त केला.
श्री समर्थ सद्गुरु गणपतराव महाराजांनी भारतीय सुराज्य संस्थेची स्थापना करून जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा अशा संकुचित विचारांना आवर घालण्यासाठी आणि राष्ट्रीय एकतेला चालना देण्यासाठी प्रयत्न केले. या सद्गुरूंच्या तळमळीचे प्रतिनिधित्व मुलांनी केले.

व्यक्तींमध्ये सलोखा, बंधुता, प्रेम आणि शिक्षणाचे मूल्य प्रस्थापित करून आदर्श भारत घडवण्याच्या उद्दिष्टाने भारतीय सुराज्य संस्था कार्यरत आहे. लहानपणापासूनच ही मूल्ये अंगीकारण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रसंगी भारतीय सुराज्य संस्थेचे अध्यक्ष, श्री श्रीशैलेश्वर विद्याकेन्द्राचे शिक्षक, रामराज्य कलामेळाचे कार्यकर्ते आणि कन्नूर व आजूबाजूच्या भागातील सुमारे ५१५ मुले या निदर्शनात सहभागी झाली होती. या विद्यार्थ्यांनी “ दहशतवाद निर्मूलनात माझी भूमिका” या विषयावर निबंध लिहिण्याची स्वप्रेरणेने तयारी दर्शवली. सभा एका मिनिटाच्या मौन पाळून संपविण्यात आले.