सुळगा (हिं.) / वार्ताहर

सीमालढ्यात प्राणाचे बलिदान दिलेल्या बेळगावातील ९ हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक आवारात म. ए. समितीच्या बहुप्रतीक्षित स्मृती भवनच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. रविवार (दि. ३०) मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते तथा तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले व त्यांच्या पत्नी सौ. प्रिती चौगुले यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत भूमीपूजन कार्यक्रम पार पडला.

माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी जगाच्या इतिहासात भाषा आणि संस्कृती टिकावी म्हणून इतके प्रदीर्घ काळ झालेले आंदोलन हे कदाचित फार मोठे आंदोलन बेळगाव आणि सीमाभागातील नागरिकांनी केलेले आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीवेळी कर्नाटकातील धारवाड, हुबळी, विजापूर हे जिल्हे तत्कालीन मुंबई राज्यात समाविष्ट होते. त्यामुळे बेळगाव हा कर्नाटकाचा भाग असल्याचा अपप्रचार होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

तर आर. एम. चौगुले यांनी सीमालढ्यासाठी त्याग केलेल्यांच्या त्यागाची भूमी म्हणून ही भूमी गौरविली जाणार असल्याचे सांगून सीमालढ्याचा इतिहास नवीन पिढीला समजावा म्हणून उभारल्या जात असलेल्या स्मृतीभवनच्या आराखड्याबद्दल माहिती दिली.

यावेळी मध्यवर्ती म. ए समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी महापौर तथा मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, रमाकांत कोंडुसकर, मदन बामणे, सरस्वती पाटील, तालुका म. ए. समितीचे सचिव ॲड. एम. जी. पाटील, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, शुभम शेळके, अनिल पाटील, लक्ष्मण होनगेकर यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.