बेंगळूरू : भारत – पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. या संदर्भात बोलताना गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी परिस्थिती गंभीर असल्यामुळे पोलिसांना रजा दिल्या जाणार नाहीत अथवा वाढीव रजा मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
देशाच्या सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती केंव्हा निवळून सर्वसामान्य होईल सांगता येत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना खबरदारीची सूचना नुकतीच जारी केली आहे असे त्यांनी पुढे सांगितले. देशाच्या सीमेवर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली असताना भारत ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानची दाणादाण उडवत आहे. सीमेवरील भारताच्या शहरांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता पाकिस्तानकडून क्षेपणास्त्रांचा (मिसाईल) हल्ला होण्याची शक्यता असल्याने केंद्राकडून हाय अलर्टची घोषणा करण्यात आली आहे. सीमा प्रदेशासह महत्त्वाच्या प्रदेशांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील मंगळूर आणि कारवारमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक सक्त करण्यात आली आहे. या ठिकाणी नौसेनेसह पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तसेच कोणालाही रजा मिळणार नाही अशी सूचना देण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री परमेश्वर यांनी दिली.