विजयपूर / दिपक शिंत्रे
भारताने पाकिस्तानमधील दहशतवादाच्या अड्ड्यांवर केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, दहशतवाद्यांच्या यादीतील आलमट्टी धरणावर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला असून, कडेकोट बंदोबस्त करण्यात आले असून तपासणीत अधिक कडकपणे करण्यात येत आहे.
आलमट्टी जलाशयाची सुरक्षा कर्नाटक राज्य औद्योगिक सुरक्षा दलाच्या (KSISF) अखत्यारीत असून, २४ तास अत्यंत दक्षतेने सुरक्षा पुरवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य पोलिस विभागाकडून सर्व धरणांच्या आजूबाजूला सुरक्षा वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धरणाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील आलमट्टी पेट्रोल पंपापासून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची माहिती नोंदवली जात असून, आवश्यक असल्यास तपासणी केली जात आहे. KSISF चे निरीक्षक शिवलिंग कुरेण्णावर यांनी सांगितले की, आधुनिक शस्त्रास्त्रे, बंदुका आणि बॉम्बसुद्धा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

- जड वाहनांना बंदी :
आलमट्टी पेट्रोल पंप आणि जवाहर नवोदय विद्यालयाजवळील गेटमधून आलमट्टीमध्ये जड वाहने आणि मालवाहतुकीच्या वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. केवळ KBJNL अधिकाऱ्यांची परवानगी असल्यासच अशा वाहनांना प्रवेश दिला जाईल.
- ८६ पोलीस तैनात :
धरणाच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी एक असिस्टंट कमांडंट (डीवायएसपी दर्जाचा), दोन निरीक्षक, एक PSI, १७ ASI आणि ६५ पोलीस कर्मचारी २४ तास शिफ्टनुसार ड्युटीवर तैनात करण्यात आले आहेत.
- बॅकवॉटर क्षेत्रातही तपासणी :
धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात दररोज रात्री एकदा आणि दिवसा दोन वेळा बोटींच्या साहाय्याने पेट्रोलिंग व तपासणी केली जाते. जलाशयाच्या पुढील भागात पाण्याचा अभाव असल्यामुळे खालच्या भागातही पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या पोलीस कर्मचार्यांच्या कामकाजाची दर तासाला पोलीस उपनिरीक्षक स्तरावरील अधिकारी पाहणी करतात. KSISF च्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, मुख्यालयाबाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एकूणच , जलाशयाच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.