- रचिन रवींद्र ठरला विजयाचा हिरो
- सूर्याच्या पलटननेही दिली कडवी झुंज
चेन्नई दि. २३ मार्च : चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या १८ व्या मोसमातील तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर 4 विकेट्सने मात केली आहे. या विजयासह चेन्नईने यंदाच्या हंगामाची विजयाने सुरुवात केली आहे. मुंबईने विजयासाठी दिलेल्या १५६ धावांचे आव्हान चेन्नईने १९.१ ओव्हरमध्ये ६ विकेट्स गमावून पूर्ण केले.
चेन्नई सुपर किंग्सला अखेरच्या षटकात विजयासाठी ६ चेंडूत ४ धावांची गरज असताना रचिनने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत संघाला विजय मिळवून दिला. सततच्या विकेट्स गमावल्याने मुंबई इंडियन्स मोठी धावसंख्या उभारू शकले नाही. पण त्यांनी अखेरपर्यंत हार मानली नाही आणि सीएसकेला विजयासाठी मोठे कष्ट घ्यावे लागले. मुंबई इंडियन्सकडून या सामन्यात पदार्पणवीर युवा खेळाडू विघ्नेश पुथूरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मुंबई इंडियन्सने दिलेल्या १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरूवातही चांगली झाली नाही. राहुल त्रिपाठी दुसऱ्या षटकातच बाद झाला पण यानंतर ऋतुराज गायकवाडने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात जलद अर्धशतक झळकावत मुंबई इंडियन्सवर दबाव आणला.
चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली, नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सुरूवात खूपच खराब झाली, रोहित शर्मा ३ चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. यानंतर रायन रिकल्टन १३ धावा, विल जॅक्स ११ धावा करत बाद झाले. यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने संघाचा डाव सावरला. अर्धशतकी भागीदारी करत मुंबई इंडियन्सला १०० धावांपर्यंत नेले.
यानंतर रॉबिन मिंज ३ धावा, नमन धीर १७ धावा, सँटनर ११ धावा करत बाद झाले. तर दिपक चहरने २८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सीएसकेकडून नूर अहमदने ४ विकेट्स घेत सामना फिरवला. तर खलील अहमदने मुंबईला सुरूवातीचे विकेट घेत धक्के दिले आणि ३ विकेट्स नावे केले. तर नॅथन एलिस आणि अश्विन यांनी १-१ विकेट घेतली.