- तालुक्यात चर्चेचा विषय ; अध्यक्षा – उपाध्यक्षांना दिलासा
- मात्र विरोधकांना चपराक
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील चापगाव ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा गंगव्वा सिद्धाप्पा कुरबर व उपाध्यक्षा मालुबाई अशोक पाटील यांच्यावरील अविश्वास ठरावाला कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने तिसऱ्यांदा अविश्वास ठराव बारगळला आहे. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षांना दिलासा मिळाला असून विरोधकांना चपराक बसली आहे. त्यामुळे तालुक्यात चापगाव ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्षांचा अविश्वास ठराव हा तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.
ग्रामपंचायतमध्ये एकूण ९ सदस्य संख्या असून ६ सदस्यांनी दि. ६ डिसेंबर रोजी अध्यक्ष – उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल केला होता. या ठरावावर अध्यक्ष – उपाध्यक्षांनी स्थगिती आणली होती. त्यानंतर दि. ५ फेब्रुवारी रोजी पुन्हा अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यावेळी देखील उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली होती. पुन्हा दि. १७ मार्च रोजी अविश्वास स्तरावर मतदान होणार होते. अध्यक्षा उपाध्यक्षांनी या ठरावाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने सदर अविश्वास ठरावावर स्थगिती दिल्याने तिसऱ्यांदा अविश्वास ठराव बारगळला आहे. अध्यक्ष गंगव्वा कुरबर आणि उपाध्यक्षा मालुबाई पाटील यांना दिलासा मिळाला आहे. मात्र विरोधकांचा हिरमोड झाला असून, न्यायालयाने तिन्ही वेळेला अविश्वास ठरावाच्या विरोधात स्थगिती दिल्याने गेल्या पाच महिन्यापासून चापगाव ग्रा. पं. च्या विकासाला खिळ बसली आहे.

- विकास अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश
हलगा ग्रा. पं. च्या अविश्वास ठरावाच्या फॉर्म नंबर १ च्या प्रतीवर विकास अधिकाऱ्यांनी नुकतीच सही केल्याने तांत्रिक मुद्द्यावरून उच्च न्यायालयाने हलगा विकास अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्याचा आदेश बजावला आहे. त्याचप्रमाणे दि. ५ फेब्रुवारी रोजी अविश्वास ठरावाच्या प्रतीवर तत्कालीन विकास अधिकारी प्रकाश इंगळे यांनी फॉर्म नंबर १ वर स्वाक्षरी करून प्रांताधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवला होता. हा मुद्दा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने याच मुद्द्यावरून चापगाव विकास अधिकाऱ्यांवर उच्च न्यायालयाकडून कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.