बेळगाव / प्रतिनिधी

भगवान महावीरांच्या तत्वज्ञानाचे पालन करून जगात शांती स्थापित करता येते. भगवान महावीरांचे तत्वज्ञान आजच्या जीवनशैलीत प्रासंगिक आहे आणि त्यांचे पालन करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असे विचार केरळच्या केंद्रीय विद्यापीठाचे कुलपती प्रा. सिद्दू अलगुर यांनी व्यक्त केले. बेळगाव शहरात भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीने महावीर जन्मकल्याणक निमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, आज जगातील अनेक देशांमध्ये युद्धे सुरू आहेत. ते म्हणाले की, जर आपण अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या भगवान महावीरांच्या तत्वांचा अवलंब केला तर जगात शांतता प्रस्थापित होऊ शकते. या समारंभात बोलताना बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आपले विचार व्यक्त केले. हुबळी येथील शिक्षणतज्ज्ञ महेश सिंघवी, वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि भारतीय रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी अजय जैन यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. या समारंभात महापौर मंगेश पवार यांनीही आपले विचार मांडले. प्रत्येकाने शांतता आणि अहिंसेच्या तत्त्वांचे पालन केले पाहिजे.

आ. अभय पाटील, माजी आ. संजय पाटील, उपमहापौर वाणी जोशी, भाजप नेते एम.बी. झिरली , केपीसीसी सचिव सुनिल हणमन्नवर, मनोज संचेती, भरतेश शैक्षणिक संस्थेचे सचिव विनोद दोड्डण्णावर, उदोयगपती सचिन पाटील, नगर सेवक जयतीर्थ सवदत्ती, संतोष पेडणेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. संगिता कटारिया यांनी नमोकार मंत्राचे पठण केले. प्रियंका जुटिंग यांनी स्वागतगीत गायले. राजेंद्र जैन यांनी प्रास्ताविक केले. विक्रम जैन यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

प्रारंभी टिळक चौकातून भव्य शोभयात्रा काढण्यात आली. शोभयात्रेत हजारो अबालवृद्ध सहभागी झाले होते. धर्मवीर संभाजी चौकातून प्रारंभ झालेल्या शोभयात्रेत भगवान महावीर यांच्या जीवनातील प्रसंग देखाव्याद्वारे साकारण्यात आले होते. भगवान महावीर यांचा जन्म सोहळ्याचा प्रसंग एका चित्ररथावर साकारण्यात आला होता.भगवान महावीर यांची मूर्ती एका रथात स्थापन करण्यात आली होती. शोभयात्रेत अग्रभागी घोड्यावर किरीट घालून बसलेली मुले – मुली साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.तरुणीच्या लेझीम पथकाने देखील आपली कला सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. महिलांचे टिपरी पथक देखील शोभयात्रेत सहभागी झाले होते. शोभयात्रेच्या मार्गांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ठिकाठिकाणी सडा घालून शोभयात्रेचे स्वागत करण्यात येत होते. शोभयात्रेच्या मार्गांवर अनेक संस्था आणि युवक मंडळातर्फे सरबत, ताक आणि लस्सीचे वितरण करण्यात आले.

शेरी गल्ली, मठ गल्ली, कपिलेश्वर पूल, एस.पी.एम. मार्गे शहापूर कोरे गल्ली, गोवावेस महावीर भवनाजवळ शोभयात्रेची सांगता झाली. महावीर भवन येथे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यावेळी हजारो नागरिकांनी याचा लाभ घेतला.