- उंची संवर्धन व बाल संस्कार शिबिराचा समारोप
बेळगाव : “बालपणीच मुलां वर संस्कार केले तर आयुष्यभर ते उपयोगी ठरतात. आज संपन्न होत असलेल्या शिबिरामध्ये अनेक विद्यार्थ्यांवर योगाबरोबरच जे संस्कार करण्यात आले ते त्यांना आयुष्यभर उपयोगी पडतील” असे विचार मराठा मंदिर चे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांनी बोलताना व्यक्त केले.
योग विद्याधाम फाउंडेशनच्या वतीने मराठा मंदिर ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय “उंची संवर्धन व बाल संस्कार शिबिराचा समारोप गुरुवारी सकाळी झाला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अप्पासाहेब गुरव व विश्वासराव घोरपडे हे उपस्थित होते. तर व्यासपीठावर अच्युत माहूली, रामजी गडगाणे, अरुण नरगुंदकर आणि दीपक गोजगेकर आदी उपस्थित होते.
सौ. सरोजताई पाटील व सौ. अपर्णा गोजगेकर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. प्रारंभी स्वागत आणि नृत्य झाल्यानंतर सरोज पाटील यांनी भगवान महावीरांच्या कार्याची आणि योग विद्याधाम फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. शंभर बालके सहभागी झालेल्या या शिबिरासाठी मराठा मंदिर चे संस्थापक अर्जुनराव घोरपडे यांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचा उल्लेख अप्पासाहेब गुरव यांनी केला. पालकांचा विशेष सहभाग लाभलेल्या या शिबिरात महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्व शिबिरार्थीना प्रमाणपत्र देण्यात आले तर शिबिराची सांगता झाली.